
अंतर्गत वादातून निर्घृण हत्या…!
ग्रामपंचायत सदस्याच्या पतीचा थेट सहभाग
आरोपी फरार, पोलिसांची गोंधळलेली पावले
घनसावंगी (प्रतिनिधी) : घनसावंगी तालुक्यातील शेवता गावात ग्रामपंचायतीतील अंतर्गत वादाचा थरारक आणि धक्कादायक शेवट शुक्रवार रात्री झाला. ५७ वर्षीय लक्ष्मण अश्रुंबा कांबळे यांची घरासमोरच निर्घृण हत्या करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्याच्या पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल असून सर्व आरोपी घटनेनंतर पसार झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पूर्वीही दोन्ही कुटुंबांत वाद होते. ग्रामस्तरीय तोडगा काढूनही परिस्थिती सामसूम झाली नव्हती. याच रागातून आणि जुन्या वैमनस्यातून आरोपी राहूल सोनवणे व त्याच्या नातेवाइकांनी घरासमोर काठ्यांनी हल्ला चढवला. या मारहाणीत कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. फिर्यादी व साक्षीदारांनाही धमक्या, शिवीगाळ व मारहाण करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामपंचायत सदस्याच्या पतीचे नावच प्रमुख आरोपी म्हणून समोर येत असताना गावकऱ्यांमध्ये संताप उसळला आहे. स्थानिक सत्तेचा रौद्र वापर करून गुन्हा दडपण्याचा प्रयत्न तर होणार नाही ना? अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. पोलिसांनी गंभीर गुन्हा नोंदवला असला तरी सर्व आरोपी फरार, आणि गावात भीतीचे सावट कायम. आता प्रश्न एकच हत्या करूनही आरोपी बेफिकीर फिरतील का, की पोलीस यंत्रणा तातडीने खरा न्याय देईल?
