




जवखेडा ठोबरे गावात लंकाबाई बिलघे यांच्या घरावर मोठा हल्ला – ३५ जणांसह ८०-९० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
भोकरदन (प्रतिनिधी) :
दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता जवखेडा ठोबरे येथे लंकाबाई सरदार बिलघे यांच्या घरावर शेकडो जणांच्या जमावाने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.
लंकाबाई यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या पुतण्याचा पवन बिलघे याचा केदारखेडा येथे भुसार मालाचा व्यवसाय होता. शेतकऱ्यांचे काही पैसे बाकी राहिल्याने त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत व तो सध्या तुरुंगात आहे. या कारणावरून गावातील बाबासाहेब सखाराम वराडे व पप्पु उर्फ भास्कर सांडु ठोबरे यांनी गावातील ३५ जण व इतर ८० ते ९० लोकांना एकत्र करून लंकाबाई यांच्या घरावर हल्ला केला.
हल्लेखोरांनी घराचे गेट मोडले, खिडक्यांवर दगडफेक केली, कॅमेऱ्यांची तोडफोड केली, लाकडांचे ओंडके घरावर फेकले व घरात घुसून महिलांना शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. यावेळी लंकाबाईंची गरोदर मुलगी उपस्थित होती तरीदेखील आरोपींनी निर्दयीपणे धमक्या दिल्या.
या प्रकरणी लंकाबाई यांनी नमूद केलेली प्रमुख नावे अशी आहेत. बाबासाहेब सखाराम वराडे, पप्पु उर्फ भास्कर सांडु ठोबरे, रमेश एकनाथ ठोबरे, उमेश गुरजुराम ठोबरे, गणपत दादाराव ठोबरे, गणपत हिम्मताव ठोबरे, नारायण ठोबरे, संजु ठोबरे, रामेश्वर फकिरबा ठोबरे, बाबासाहेब माधवराव ठोबरे, विजय सर्जेराव ठोबरे, परमेश्वर ठोबरे, शरद ठोबरे, संजु रामकिसन ठोबरे, सुभाष ठोबरे, आकाश राजु आढावे, वनिता गिरजुराम ठोबरे, राधाबाई रमेश ठोबरे, जगदीश भगवान ठोबरे, अशोक ठोबरे, श्रीराम सोरमारे, गंगाधर काळे, भाऊसाहेब घोडे, परमेश्वर सुभाष ठोबरे, विजय सर्जेराव ठोबरे, संजु रामकिसन ठोबरे, रामेश्वर फकिरबा ठोबरे, पांडुरंग बाजीराव पडोळ, डिगांबर कडुबा वाघ, लक्ष्मीबाई विजय वाघ, पंढरीनाथ शेनफड तांबडे, गौतम शामराव राऊत, गोविंदराव विठोरा बकाल, श्रीमंता हिम्मतराव लोखंडे, दत्तात्रय साहेबराव ठोबरे याशिवाय अन्य ८०-९० लोकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत गावातील वाळू तस्कर व समाजकंटकांचा मोठा सहभाग असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा हल्ला पोलिसांसमोर झाला असून तरीही आरोपींनी निर्भीडपणे दगडफेक व तोडफोड चालूच ठेवली.
सध्या भोकरदन पोलिस ठाण्यात दंगल, मारहाण, तोडफोड, जीवे मारण्याची धमकी, सरकारी आदेशाचा भंग आदी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस अधीक्षकांकडून तक्रारीकडे दुर्लक्ष – पीडितांचा आरोप
जवखेडा ठोबरे येथील लंकाबाई बिलघे यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणी तक्रारदाराने थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली. मात्र, तक्रार ऐकून गंभीर दखल घेण्याऐवजी पोलीस अधीक्षकांनी टोलवाटोलवी केली, उडवा-उडवीची भाषा केली, असा धक्कादायक आरोप तक्रारदाराने माध्यमांशी बोलताना केला आहे.
इतक्या मोठ्या संख्येने लोकांनी महिलांच्या घरावर हल्ला करून दंगल माजवली, जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या, तरीही वरिष्ठ अधिकारी घटनाकडे हलक्याने पाहतात, ही पोलीस प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब असल्याचे स्थानिकांचे मत आहे.
पीडितांचा आरोप आहे की, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही वरिष्ठ स्तरावरून योग्य ती कारवाई होत नाही. त्यामुळे आरोपी अजूनही दबंगपणे फिरताना दिसत आहेत.
या प्रकरणामुळे जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेच्या कामगिरीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, पोलिस अधीक्षक नागरिकांच्या तक्रारी किती गांभीर्याने घेतात, याचे हे जिवंत उदाहरण असल्याची चर्चा जनतेत सुरू आहे.
